औरंगाबाद : वादग्रस्त विधान करणारे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा पुतळा आज भाजपने गुलमंडीवर जाळला. हिंदू विरोधी वक्तव्य केल्यास सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा यावेळी आ. अतुल सावे यांनी दिला.
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी आम्ही १५ कोटी शंभर कोटीसाठी पुरेसे आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा भाजपतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. आज सकाळी अकराच्या सुमारास आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, डॉ. भागवत कराड, नगरसेवक प्रमोद राठोड, दयाराम बसैये, अनिल मकरिये यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी गुलमंडीवर निदर्शने केली. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम, या वारिस पठाण करायचं काय अशी घोषणाबाजी करण्यात आली.
पोलिसांना दिली हुलकावणी !
दरम्यान शांततेने निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी सुरक्षा कडे केले होते. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यावेळी अचानक कारमधून वारिस पठाण यांचा पुतळा आणण्यात आला. आणि क्षणार्धात कार्यकर्त्यांनी त्याला जोडे मारले अन पुतळा जाळून टाकला. पोलिसांनी पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अखेर आंदोलकांचा गनिमी कावा यशस्वी झाला.